Breaking News

ही शिवशाही नाही ही तर बेबंदशाही भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार ॲड आशिष शेलार

कुडाळ: प्रतिनिधी

शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला. सेनेचं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मिळून राज्यात जे काही सुरु आहे ती बेबंदशाही असल्याची टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद, आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज केली.

ॲड आशिष शेलार सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून भाजपकडून जिल्ह्यात कुडाळ व मालवण येथे २५ हजार मास्क वाटप, ४०० ॲाक्सिमीटरच वाटप करण्यात येणार आहे, त्याचा शुभारंभ ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, सभापती सावंत, राजू राउळ, रणजित देसाई आदी उपस्थित होते.

राज्यात सध्या बेबंदशाही सुरु आहे. या सरकारच बळ असलेल्या शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री स्थगिती देतात? म्हाडाने कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना दिलेल्या सदनिकांच्या चाव्या पवार साहेबांच्या हस्ते वाटल्या होत्या, मानवतेच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी एका सहीत स्थगिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा थकीत पगार दिला आणि पुन्हा तो परत मागितला? हा काय खेळ सुरु आहे? ओबीसी खात्याच्या मंत्र्यांनी घटनाबाह्य कृती करत आयोगाची बैठक बोलावली आणि मग सारवासारव केली. निर्बंधावरील सूट मंत्री वडेट्टीवार घोषित करतात आणि मुख्यमंत्री कार्यालय निर्णय फिरवतं हे काय सुरु आहे? असा सवाल करत घेतलेला निर्णय कधीही फिरवतात हीच बेबंदशाही असल्याची टीका त्यांनी केली.

आज काही लसीकरण केंद्रांची, कोविड केंद्रांची पाहणी आम्ही केली. अतिशय निराशाजनक, संतापजनक स्थिती आहे. पालकमंत्री दिसतच नाहीत. आरोग्य यंत्रणेत पदे रिक्त आहेत. निसर्ग आणि तौक्तेच्या नुकसानीची मदत झालेली नाही. रतन खत्रीचे आकडे लावल्यासारखे सरकारने मदतीचे आकडे फक्त सांगितले. मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षण, पदोन्नती, शिक्षण अशा विविध प्रश्नांवर सरकारला आम्ही जाब विचारु म्हणून चटावरील श्राद्ध उरकावं अस अधिवेशन सरकार करत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला नख लावण्याचं काम याच सरकारातील मंत्री करत आहेत. काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी याबाबत याचिका दाखल केली, त्यांना काँग्रेस अजूनही मानाच स्थान देत आहे. आणि असा कट करणाऱ्यांना शिवसेना मांडीवर घेवून बसली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावेळी जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेऊन त्यांनी संघटनात्मक आढावा घेतला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकांच्या दृष्टीने ही बैठक घेतली.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *