Breaking News

राज्याची जगासमोर प्रतिमा पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आज दोन वर्षे झाली. दोन वर्षाच्या सरकारच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारं असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.

आघाडी सरकारच्या दोन वर्षा निमित्ताने आज प्रदेश भाजपा कार्यालयात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा या नाटका प्रमाणे तीन पक्षांचा तमाशा असल्याची टीका केली. मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही. तसेच आज कोणता आरोप अथवा टीका ही करायची नाही. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या त्या मांडत आहोत. काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच याचं नाटक आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचण काहीच नाही एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटतं. त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचं दिसते. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब, पेग, पार्टी आणि पेग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरु करा असे म्हणत होते. तेव्हा पब आणि बार सुरु केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्र प्रेमाने झाल्याची टीकाही त्यांनी केली.

तसेच सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्री पदी अनिल देशमुख यांना बसवले, त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलिस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. महाराष्ट्राची ही वेदना आहे.

पुतण्या प्रेमाने त्यांना पुतण्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याचे काय उद्योग सांगावे? १ हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. कुठून आली संपत्ती? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडुन जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा, पण कारखाना तोट्यात दाखवायचा, बँकेने मग लिलाव करायचा, मग तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा.. असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आल्याचा आरोप त्यांनी केला.

या सरकार मध्ये सामान्य माणसाचे भले झाले नाही. अहंकार, अतर्क, असंवेदनशील कार्यपद्धती सरकारची दोन वर्षे राहिली. पेट्रोल वरील कर कमी करा अशी मागणी केली तर विदेशी दारु वरील कर कमी केला. वायनरीला सबसिडी दिली पण शेतकऱ्यांबाबत काही बोलायला तयार नाही. वीस वर्षापुर्वीच्या कार्यक्रमाचा एका एजन्सीला पैसा दिला गेला पण एसटीच्या कामगाराला द्यायला तयार नाही. रयत शिक्षण संस्थेला करोडो दिले जातात, आमचा विरोध नाही, पण शाळांना अनुदान दिले जात नाही. शाळा बंद मात्र फी वाढवली जाते. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे बंद केले जाते. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाचा हक्क काढून घेतला जातो. लोकशाहीला मारक असे हे निर्णय का घेतले जातात?हे सगळे तर्कात न बसणारे असल्याचा टीका त्यांनी केली.

असनदशीर मार्गावरील सरकार

‘सोळा हजार ग्रामपंचायती.वर प्रशासक म्हणून स्वतः ची लोक बसवण्याचा डाव सरकारचा होता, पण हा डाव न्यायालयाने फेटाळला. कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांची काय सोय केली, असे म्हणत न्यायालयानं सरकारला फटकारलं. प्रतिज्ञापत्रच स्विकारलं नाही. अंतिम वर्षे परिक्षा न घेण्याच्या निर्णयावरुन ही सरकारला न्यायालयाने फटकारुन परिक्षा घ्यायला लावल्या. पीएमआरडीच्या थेट नियुक्ती रद्द करुन निवडणूक घ्यायला लावली, अशा असंख्य निर्णयात न्यायालयाने सरकारला धारेवर धरल, कधी निर्णय रद्द केले, कधी मागे घ्यायला लावले, कधी कान उघडणी केली. सरकारचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. सरकारची वाटचाल असनदशीर मार्गवरची असल्याचा आरोप त्यांनी केला.

 अहंकार तर या सरकारच्या ठायी ठायी भरलेला

मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही, माझ्या पक्षाविषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

 सरकार असंवेदनशील

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ५० हजार देऊ म्हणणारे १० हजारची घोषणा केली तेही देऊ शकले नाहीत. एफआरपी साठी आंदोलने झाली पण हे सरकार तीन टप्प्यात एफआरपी नको म्हणते, कोरोना काळात देशाचे अर्थचक्र ज्या शेतकऱ्यांनी चालवले त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली जात आहे. महिला अत्याचाराच्या बाबतीत तर अत्यंत असंवेदनशील पणा दिसतो. गेल्या सात महिन्यात मुंबईत ५५० बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेलेत. बाकी पक्षाचे मंत्री, युवा संघटनेचे पदाधिकारी, मंत्री राजिनामा हे विषय सगळ्यांना माहिती आहेच..शक्ती कायदा कुठे आहे? असा सवाल करत त्यांनी ११ वीचे प्रवेश कधी संपणार? मराठा समाजाचे आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. भूमिका काय? ओबीसी राजकीय आरक्षण सरकारला न्यायालयात टिकवता आले नाही. सरकार काय करणार? अशा प्रत्येक आघाडीवर सरकार असंवेदनशील वागतेय या आमच्या वेदना आहेत. असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *