मुंबईः प्रतिनिधी
राज्यात सत्तेस्थानी असलेल्या भाजपमध्ये एकाधिरशाहीचा अनुभव सरकार पातळीवर सुरु आहे. मात्र त्याचे अनुकरण पक्षाच्या कामकाजातही पडताना दिसत असून धुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने स्थानिक नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविण्याऐवजी बाहेरील व्यक्तीकडे अर्थात जळगांवचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा गिरीष महाजन यांची प्रभारी पदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याने धुळे शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे हे चिडले असून भाजपातंर्गत लोकशाहीचा खोचक भाषेत निषेध जाहीर पत्राद्वारे निषेध केला. त्यामुळे भाजपमधील एकाधिरशाहीच्या विरोधातील धुसफुस यानिमित्ताने बाहेर येत असल्याचे चित्र निर्माण झाले.
धुळे जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजीचा प्रकार काही नवा नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेण्यासाठी प्रसिध्द असलेल्या अनिल गोटे यांना सुरुवातीला भाजपकडून रसद पुरविण्यात येत होती. मात्र मधल्या काळात अनिल गोटे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खप्पा मर्जी झाल्याने ते काहीसे पक्षातून बाजूला पडले. तरीही धुळे महापालिकेची जबाबदारी आपल्याला मिळावी यासाठी गोटे प्रयत्नसील होते. मात्र प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी गोटे यांना बाजूला सारत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवडणूकीची जबाबदारी सोपविली. त्यामुळे चिडलेल्या गोटे यांनी प्रदेशाध्यक्षांना जाहीर पत्र लिहीत महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या किती पालिका निवडणुकींमध्ये भाजप प्रदेशाने असे बाहेरच्या जिल्ह्यातील प्रभारी नियुक्त करुन पाठविले ? “धुळे जिल्ह्यातील भाजपामधे गटबाजीसाठी प्रभारी नेमले ” असा सवाल करत महाराष्ट्रातील कुठला जिल्हा गटबाजी मुक्त आहे ? असा खोचक प्रश्न जाहीर पत्राद्वारे विचारला.
तसेच प्रामाणिक , निष्ठावान पक्षाशी इमान राखणार्या कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वाच्या लेखी किंमत राहीली नसल्याची भावना गोटे यांनी व्यक्त करत पक्षाच्या धैय धोरणाशी विसंगत मी कुठले काम केले ? किंवा शत्रू पक्षाशी हात मिळवणी करुन स्वतःच्या भावाला , मुलाला संस्थांवर, संचालक पदी पक्ष पॅनलशी गद्दारी करुन निवडून आणले याच एक तरी उदाहरण महाराष्ट्राला कळू द्या ! असे आव्हानही त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना दिले.
पक्षाच्या स्थानिक आमराला विश्वासात न घेता परस्पर नियुक्ती करण्याच्या लोकशाही प्रक्रीयेला सलाम ! जो आमदार दोनदा अपक्ष निवडून आला. स्वतःच्या बळावर बहुमताने स्वतःच्या पत्नीस नगराध्यक्षपदी बहुमतासह निवडून आणले. अशा लोकप्रतिनिधीवर अविश्वास दर्शवून त्याचा प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या पक्षांर्तगत लोकशाहीचा विजय असो असे म्हणत अनिल गोटे यांनी दानवे यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
त्याचबरोबर अशा पध्दतीने काम करणाऱ्या काम करणाऱ्या नेत्यांना धुळ्याची जनता पराभूत केल्याशिवाय रहात नसल्याची आठवणही गोटे यांनी पक्षनेतृत्वाला करून दिली.
अनिल गोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांना लिहिलेले पत्र
माननीय रावसाहेब दानवे
अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश
सप्रेम नमस्कार,
आत्ताच प्रदेश भाजपातर्फे प्रसिध्दीस दिलेले श्री गिरीष महाजन यांची धुळे पालीका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती केल्याचे पत्र व्हाट्स अॅपवर वाचावयास मिळाले. आपल्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत ! प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या किती पालीका निवडणुकींमधे प्रदेशाने असे बाहेरच्या जिल्ह्यातील प्रभारी नियुक्त करुन पाठविले ? “धुळे जिल्ह्यातील भाजपामधे गटबाजी आहे यासाठी प्रभारी नेमले ” आपले म्हणणे मान्य आहे. महाराष्ट्रातील कुठला जिल्हा गटबाजी मुक्त आहे ? हेही कळाले तर बरे होईल !
माझ्या असे लक्षात आले की, प्रामाणिक , निष्ठावान पक्षाशी इमान राखणार्या कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वाच्या लेखी किंमत राहीली नाही. पक्षाच्या धौय्य धोरणाशी विसंगत मी कुठले काम केले ? किंवा शत्रू पक्षाशी हात मिळवणु करुन स्वतःच्या भावाला , मुलाला संस्थांवर संचिलकपदी पक्ष पॅनलशी गद्दारी करुन निवडून आणले याच एक तरी उदाहणण महाराष्र्टाल कळू ध्या ! स्वर्गिय अटलजींच्या दुखवटा सप्ताहात सत्कार घेवून पूर्वी झालेल्या भूमीपूजनाचे पुनश्च भुमीपूजन करण्याचे अशोभनीय कृत्य केले ? असो !
एक निश्चित की, बदल्यांमधे दलाल्या करणारे, नामचीन गुंडांच्या टोळी प्रमुखांच्या घरी येरझार्या घालून तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून लाल गालीचा घालणारे, ज्यांना दिन दयालजी ,त्यांचा एकात्म मानवादाचा स्पर्श नसणारे, पितिंबर दासजी , बलराज मधोक, नानाजी देशमुख , रामभाउ म्हाळगी, मोतीरामजी लहाने, बच्छराजजी व्यास , सुर्यभानजी वानखेडे जगन्नाथराव जेशी यांची नावे सुध्दा कानावरुन न गेलेल्यांची चलती सध्या पक्षात आहे . आमच्या सारख्या जुनाटाना नव्या रचनेत स्थान नाही हे आपण वेळीच लक्षात आणून दिले . या बद्दल धन्यवाद ! आभार !
पक्षाच्या स्थानिक आमराला विश्वासात न घेता परस्पर नियुक्ती करण्याच्या लोकशाही प्रक्रीयेला सलाम ! जो आमदार दोनदा अपक्ष निवडून आला. स्वतःच्या बळावर बहुमताने स्वतःच्या पत्नीस नगराध्यक्षपदी बहुमतासह निवडून आणले. अशा लोकप्रतिनिधीवर अविश्वास दर्शवून त्याचा प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या पक्षांर्तगत लोकशाहीचा विजय असो !
एक बाब सहज लक्षात आणून देतो. असा प्रयोग श्री सुरेश जैन यांनी करुन पाहीला होता. धुळेकरांनी जळगावच पार्सल परत केले. त्याची पुर्नरावृत्ती केल्या शिवाय धुळेकर रहाणार नाहीत. धुळ्याची जनता जबरदस्त स्वाभीमानी आहे. त्यांना बाहेरुन कुणी येवून आपल्याला टक्कल शिकवेल ही कल्पनाच सहन होणारी नाही. जिल्ह्यातीलच पण शिरपूरचे विकास पुरुष श्री अमरिष भाई पटेल यांना सलग तीन वेळा याचा अनुभव आला आहे . असो !
आपण वरिष्ठनेते आहात ! आपण प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना टाळून , गुन्हेगारी व पक्ष बदलण्याची पार्श्वभूमी असणार्याना घेवून भाजपाचा झेंडा फडकवू शकाल ! मला तर, निष्ठावान ,कष्टाळू , कार्यकर्त्यांबरोबरच रहावे लागेल तीच माझी संप्पत्ती होती. आहे . राहील !
आपला
अनिल गोटे
आमदार
आपणच नेमलेला मतदार संघाचा पालक