मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत आली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा आज ईडीकडून न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावली असून या १४ दिवसात आपली चौकशी पूर्ण करावे असे आदेशही न्यायालयाने ईडीला दिले.
देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावल्यामुळे त्यांचा मुक्काम आणखी १४ दिवसांनी वाढला आहे. तसेच देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान यासंदर्भात देशमुख यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निर्णयाची पूर्ण प्रत हाती आल्यानंतर सोमवारी कायद्याने जे काही शक्य होईल ते शक्य होईल असे सांगत ईडीने देशमुख यांना पुन्हा ईडी कोठडी द्यावी यासाठी अनेक युक्तीवाद केले. परंतु न्यायालयाने ते सर्व युक्तीवाद फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपये वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली. परंतु या आयोगाच्या सुणावनीचे काम सुरु झाल्यानंतर परमबीर सिंग हे सातत्याने गैरहजर राहिले असून मागील महिन्यात यासंदर्भात त्यांनी आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आपण मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातील आरोपाशिवाय दुसरे काहीही पुरावा आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करत या व्यतीरिक्त दुसरी कुठली गोष्टही नसल्याचे स्पष्ट केले.
त्याचबरोबर परमबीर सिंग यांना दोन वेगवेगळ्या खटल्याप्रकरणी अटक वॉरंट न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहे. तसेच ते परदेशी गेल्याचे बोलले जात असून त्यांना हजर केल्याशिवाय कोणत्याही गोष्टींचा उलगडा होणार नसल्याचे बोलले जात आहे.