मुंबई : प्रतिनिधी
आपल्या फटकळ आणि बिनधास्त बोलण्याने नेहमी चर्चेत असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या या शैलीचा फटका आता मंत्रालयातील कर्मचारी, पत्रकार यांच्याबरोबरच शिवसेनेचेच सहकारी मंत्री दिवाकर रावते यांनाही बसला आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कदम यांना आवरणे अवघड असल्याची जाणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेच्या दुसऱ्या मंत्र्यांनाही झाल्याने आज दिवसभरात त्यांच्या फटकळ आणि तुसड्या वागणूकीचीच चर्चा मंत्रालयात सुरु होती.
बुधवारी मंत्रिमडंळाच्या बैठकीदरम्यान प्लॉस्टीक बंदीच्या मुदद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यत न केलेले निवेदन करावे अशी सुचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मांडली. यावर संतप्त होत याची काही गरज नाही, मी पर्यावरण मंत्री म्हणुन हे प्रकरण हाताळण्यास सक्षम असल्याचे थेट विधान रामदास कदम यांनी करत दिवाकर रावते आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले.
गेल्या काही दिवसात रामदास कदम यांना राग येणे आणि त्यांचा बोलण्यावरचा तोल जाण्याच्या प्रकारात वाढ दिसुन येत आहे. या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही पत्रकार मंत्री कदम यांना भेटून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांच्या या प्रश्नावर ते भलतेच रागवाले आणि तुम्ही मला मंत्रीमंडळ बैठकीत काय घडले हे विचारताय, तुम्हाला कळतय का तुम्ही काय विचारताय? असे म्हणत चांगलेच आकाडतांडव केले.
काही दिवसापुर्वी तर प्लॉस्टीक बंदीच्या अनुषंगाने ज्या जनहीतार्थ जाहीराती दिल्या गेल्या त्यात रामदास कदम यांचा फोटो नसल्याने त्यांनी माहीती व जनसंपर्क विभागाच्या संचालकांना बोलावून घेत चारचौघात त्यांच्यावर शिव्यांचा भडीमार केला. तसेच या संचालकाची लायकीही काढत थेट ‘तु १५ टक्के कमिशनवर काम करतोस, असाच आरोप करत ह्या जाहीरातीत फक्त मुख्यमंत्र्यांचाच फोटो आहे, माझा फोटो का नाही अशी विचारणा करत आम्ही इथे काय करायला बसतो अशी अश्लील भाषेत संचालकास धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांचे विषेश सहाय्य अधिकारी यांनी कदम यांना शांत करायचा प्रयत्न केला. मात्र तरीही कदम यांनी सांग किती दलाली घेतलीस ते सांग? असे म्हणत या संचालकाला चांगलेच धारेवर धरले.
गेले काही दिवस कदम यांचे आकाडतांडव वाढतच चालले असल्याचे या निमित्ताने दिसुन येत आहे. पर्यावरण विभागाचे महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी काढुन घेतले असल्याने शिवसेनेचे युवराज आदीत्य ठाकरे यांना सतत मंत्रालयात बोलवुन स्वताच्या प्रसिध्दीची हौस भागवुन घेतली जात असल्याचे सेनेच्याच एका जेष्ठ नेत्याने सांगितले.