Breaking News

अंदमान व निकोबार बेटांवर दूरसंचार सेवा गतिमान करण्यात या मराठी भूमीपुत्राचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली : प्रतिनिधी

भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली. सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.  हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफ चे संचालक विलास बुरडे आहेत. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली .

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे.

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ x २०० जीबीपीएस प्रतिसेकंद  बँडविड्थ असणार आहे. आणि पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ x १०० जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करता येईल. आधी मिळत असलेल्या मर्यादित सेवांचे रूपांतर जलद गतीत होईल, ४ जी मोबाईल सेवांमध्ये मोठया सुधारणा दिसून येतील.

सुधारीत टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल,  रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहणीमानाचा दर्जा सुधारेल.  चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारीत बँडविडथचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतील.

विलास बुरडे यांची चढती झेप

हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) ने महत्वपुर्ण भूमिका निभावली आहे  या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने युएसओएफ अंतर्गत दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार खात्यामार्फत निधी पुरवला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने हा प्रकल्प अंमलात आणला आहे तर टेलिकम्युनिकेशन्स कन्सलटन्टस इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १,२२४ कोटी रुपये खर्च करुन सुमारे २३०० किलोमीटर सबमरीन ओएफसी केबल टाकण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम नियोजीत वेळेत पूर्ण झाले आहे.

विलास बुरडे वर्ष १९९५ मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजु झाले. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत  येथे विविध पदांवर महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच दूरसंचार खात्याकडे मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. २०१३ मध्ये ते दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणुन प्रतिनियुक्तिवर आले. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ३००० उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजु झाले. बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्ये ही सक्रिय असतात.

२०१६ मध्ये दूरसंचार विभागातील (युएसओएफ) च्या संचालक पदाचा पदभार बुरडे यांनी स्वीकारला. त्यांच्याच कार्यकाळात महत्वकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०१८ रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून सोमवारी पंतप्रधान मोदी या प्रकल्पाचे लोकार्पण करतील, याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया बुरडे यांनी व्यक्त केली.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *