नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेवरून शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या राजकिय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे धाव घेतली. मात्र नेमके आजच संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची संध्याकाळी भेट घेणार असल्याने या बैठकीनंतरच पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय भाजपाध्यक्षांनी घेतल्याने शाम तक रस्ता देखेंगे असा सबुरीचा सल्ला फडणवीस यांना दिल्याची माहिती भाजपाच्या दिल्लीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेने सत्तेतील समसमान वाटपाची मागणी करत मुख्यमंत्री पदावर उभा दावा सांगितला आहे. त्यातच या पदासाठी शिवसेनेने पर्यायी राजकिय चाचपणीही सुरु केली आहे. त्यामुळे याप्रश्नी दिल्लीश्वरांनीच यातून मार्ग काढावा यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांना विनंती केली. मात्र सत्तेच्या समसमान वाटपाबाबत स्वतः अमित शाह हेच उत्साही नसल्याने त्यांनी याप्रश्नी सध्या तरी घडणाऱ्या घडामोडींकडे पाह्यचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात शरद पवारांच्या राजकिय खेळीकडे दुर्लक्ष करून भाजपाला कोणतीही हालचाल करता येणे शक्य नसल्याची बाब भाजपा नेतृत्वाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच शिवसेनेच्या सत्ता स्थापनेला बळ मिळणार का याचे चित्र स्पष्ट होणार असल्याने तो पर्यंत वेट अॅण्ड वॉचचे धोरण ठरल्याचे ते म्हणाले.
त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर लगेच अमित शाह यांच्याबरोबरील बैठकीत काय झाले याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्र सदन गाठणे पसंत केले. तेथे मात्र प्रसारमाध्यमांच्या गराड्यामुळे अखेर त्यांना बोलणे भाग पडले, मात्र त्यांनी बोलताना भाजपाचे सरकार राज्यात स्थापन होण्याबाबत थेट उल्लेख करण्याचे टाळत फक्त नवे सरकार स्थापन होणार असल्याचे भाष्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले- शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्या
राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मदत देणे गरजे आहे. त्यामुळे केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Tags amit shah bjp devendra fadnavis sharad pawar shivsena sonia gandhi
Check Also
अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे
भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …