सध्याच्या तरुणांची चळवळ ही गूगल ते फेसबूक अशी इथपर्यंत मर्यादीत आहे. प्रश्नाला उत्तरं भरपूर आहेत पण संदर्भ नाहीत. काही मोजकेच तरुण असे आहेत ज्यांचा आंबेडकरी चळवळीचा अभ्यास आणि प्रत्यक्ष काम सुरू असते. पण त्यांनाही ही गूगल आंबेडकरी चळवळीची तरुण डावलताना दिसतात. नुकत्याच एका भीम जयंतीच्या कार्यक्रमात गेलो होतो तेथील सर्व कार्यक्रम बौद्धिक होतात याचा आनंद आहे. पण श्रोत्यांची कमी हे आंबेडकरी चळवळीचे अपयश मानावे का? असा एक प्रश्न निर्माण झाला. व्याख्यांनाना गर्दी कमी पण मिरवणुकीला दारू पिवून नाचणाऱ्याचा उत्साह काही औरच असतो. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आजच्या पिढीने आणि या आधीच्याही आंबेडकरांचे दैवीकरण करून आंबेडकरांच्या विचारापेक्षा मूर्ती, पुतळे आणि फोटोला महत्व देण्यात धन्यता मानतात. माझ्या मते हे आंबेडकरी नवोदोत्तरी चळवळीचे अपयश असावे किंवा हल्ली प्रत्येक धर्मात फोफावत चाललेली कट्टरता आहे. Social media मुळे तरुणांची बौद्धिक पातळी आणि डोळसपणे बघण्याची कुवत ढासळत चाललेली आहे. साधारणपणे आपल्याकडे दलित साहित्य हे जिवंत साहित्य मानण्यात येते. पण तरुणांचा ह्याकडे कानाडोळा करणे आंबेडकरी चळवळीला घातक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्म आंबेडकरांच्याच काही कट्टर आंबेडकरी अनुयायी आपल्या हिशोबाने मोडीत काढत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. यात राजकीय दलित नेत्यांचेही वागणे तेवढेच महत्वपूर्ण आहे, येथे कोण्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख करणे मला रास्त वाटत नाही, पण हे वास्तव आहे. दलित अथवा आंबेडकरी नेत्यांच्या राजकारणात साहजिकच सध्या भारतीय लोकशाहीचे लचके तोडणाऱ्या भारतीय राजकारणातील नेत्यांप्रमाणेच स्वार्थ आला आहे. देश आणि लोकहितापेक्षा पक्ष आणि पद हे महत्वाचे झाले आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये काळानुरूप बदल आवश्यक होते, जे आता पर्यंत झाले नाही. पण ह्या दोन ते तीन वर्षांत निर्माण झालेले जलसे ह्यांच्या कार्यक्रमातून दिसून येते.
चळवळीत सक्रिय असलेले आजचे तरुण देहभान हरवून काम करताना दिसतात. पण अर्थांजन ही फार महत्वाची बाब आहे. महात्मा फुले यांच्या मते
‘विद्धेविना मती गेली
मती विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्त विना श्रुद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्धेने केले’
ही परिस्थिती तेव्हाची होती, जेव्हा दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते पण फुले शाहू आंबेडकर यांच्या विद्रोहाने आज शिक्षण हा हक्क झाला आहे. तरुण शिकतही आहेत. पण चळवळीत काम करणारे तरुण चळवळीत पूर्ण सक्रिय होऊन अर्थांजन करणे नाकारतात. त्याचा दुष्परिणाम हाच होतो की ते आपल्या कुटुंबाला दारिद्र्यात टाकतात आणि स्वतःही राहतात. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आपल्याला समाजाच्या बरोबरीला राहणं आवश्यक असलं तरी चळवळीबरोबर अर्थाजनाकडे लक्ष देणं तितकचं गरजेच आहे.
“आपण आपला करावा विचार, तरावया पार भावसिंधू”- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
लेखन-अंकूर वाढवे ([email protected])
Khup chhan sir!!
Shejarche wakya mi athawun dilele ahe tumhala..