मुंबई: प्रतिनिधी
कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी मागील २७ दिवस अटकेत असलेल्या आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या तिघांना आज अखेर कागदपत्रांची पुर्तता पूर्ण करण्यात आल्याने सकाळी आर्थर रोड तुरुंगातून घरी सोडण्यात आले. उच्च न्यायालयाने जामी दिल्यानंतरही गुरूवारी, शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने दोन रात्री तुरुंगात काढावे लागले. मात्र आज सकाळी कागदपत्रांची पुर्तता पूर्ण झाल्याने आर्थर रोड प्रशासनाने या तिघांना घरी सोडले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन देताना काही अटी घातल्या असून यातील कोणत्याही अटींचे उल्लंघन झाले तर एनसीबीकडून जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करू शकते असेही न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, आर्यन खान यास सकाळी ११.२ मिनिटांनी आर्थर रोड कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. त्याच्यासाठी शाहरूख खान याचे विशेष बॉडीगार्ड गाडी घेवून कारागृहाच्या बाहेर हजर झाले. तर त्याचे वडील सिने अभिनेता शाहरूख हा वरळी नाका येथील फोर सिजन फोर स्टार हॉटेलवर वाट बघत होता.
तेथून आर्यन खान हा पुढे मन्नत या बंगल्यावर पोहोचला. तेथे शाहरूख खानच्या फॅनकडून एकच गर्दी करण्यात आली होती. आर्यन मन्नत येथे पोहोचल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी त्याच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजवून आनंद व्यक्त केला. तर मन्नतवर मिठाईचे वाटप करण्यात आले.
जामीनासाठी उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी खालीलप्रमाणे…
१)प्रत्येकाला एक लाख आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला.
२)एनडीपीसी कायद्याखाली ज्या कृत्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यानुसार जामीन मिळालेला आहे, त्याच पध्दतीच्या कृत्यात सहभागी होता येणार नाही.
३)या तिघांकडून सहभागी असलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्यक्तीशी पुन्हा संवाद साधता येणार नाही किंवा फोन करता येणार नाही किंवा त्याच पध्दतीच्या कृत्यासाठी पुन्हा संपर्क करता येणार नाही.
४)न्यायालयाच्या परवानगीशिवाय निकाल लागल्याशिवाय कोणतेही न्यायाआधी कृत्य करू शकणार नाही.
५)जामीन मिळालेल्या व्यक्तीकडून वैयक्तीक किंवा अन्य कोणाच्या माध्यमातून साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकणार नाही. किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
६)पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे सुपुर्द करावा.
७)सदर प्रकरणाची सुणावनी विशेष न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने या खटल्याच्या अनुषंगाने जामीन मिळालेल्या व्यक्तींकडून कोणत्याही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयावर आपले वक्तव्य करणार नाही.
८)एनडीपीएस कायद्याखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाच्या परवानगी शिवाय कोणालाही परदेशी जाता येणार नाही.
९)जर मुंबईबाहेर जाणार असले तर त्याने तशी तपास अधिकाऱ्यांना कल्पना देणे बंधनकारक आहे.
१०)दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ याकालावधीत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक.
११)अत्यावश्यक कारण वगळता जामीन मिळालेल्या प्रत्येकाकडून कोर्टाच्या तारखांना उपस्थित राहीले पाहिजे.
१२)एनसीबीकडून जेव्हाही चौकशीसाठी बोलावले जाईल त्या दिवशी त्यांनी सहकार्य करण्यासाठी हजर व्हावे.
१३)एकदा सुणावनीला सुरुवात झाली त्यात दिरंगाई होईल असे कोणतेही कृत्य करू शकणार नाही.
१४)यापैकी कोणत्याही एका नियमाचे भंग झाल्यास एनसीबी जामीन रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज करू शकते.