पुणे: प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर आयकर विभागाने नुकतीच अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या उद्योग आणि घरांवर छापे टाकण्यात आले. यासर्व प्रकरणावरून निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाचा खुलासा करण्यासाठी अजित पवार यांनी जाहिर केल्या प्रमाणे पत्रकार परिषदेचे आयोजन केले. त्यावेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाची आठवण करून देत त्याबद्दलचा प्रश्न विचारला.
त्यास उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, त्यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. त्यावर पुन्हा प्रसार माध्यमाच्या त्या प्रतिनिधीने परत विचारला. त्यावर पुन्हा अजित पवार म्हणाले की, मग काय भाषण करू असा चिमटा त्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीलाच काढत ते पुढे म्हणाले, अरे बाबा दोघांच्याही डोक्यावर थोडेफार शिल्लक राहीलेय. राहु दे की, की उगीच आपलं…. असे म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हषा उसळला.
त्यानंतर काही प्रतिनिधींनी त्यांना भाजपा सोबत गेल्याबाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी लगेच प्रत्युत्तर देत म्हणाले की, ऐ कुठे जायचं कोणासोबत जायचं याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे. लोकशाही असल्याने प्रत्येकाला तो अधिकार आहे. असले फालतू प्रश्न विचारू नका आणि मी उत्तरही देणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले.
या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी पहिल्यांदाच मौन सोडत एकट्या जरंडेश्वर साखर कारखाना विकण्यात आला नाही. तर राज्यातील तब्बल ६५ साखर कारखाने विकले-भाड्याने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही कारखाने अत्यंत कमी किमंतीला विकण्यात आलेल्या मुद्यावर बोट ठेवत त्याबाबत कोणी विचारत नसल्याबाबत खंतही व्यक्त केली.
याशिवाय फडणवीस सरकारच्या काळातही सहकारी कारखान्यांची विक्री झाल्याचे सांगत त्याच्या किंमतीही फारशा नव्हत्या अशी आठवण करून दिली.
नवा कोरा कारखाना उभा करायचा म्हटलं तर ३५० कोटी रूपये लागतात आणि जीर्ण दिवाळखोरीत निघाला की तो कमी किंमतीत विकला जातो. यात कायदा फायदा असा सवालही त्यांनी यावेळी केला.