नाशिक: प्रतिनिधी
राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकायदक असल्याचे कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने सांगितले असल्याने सावध रहा असे इशारा वजा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
नाशिकमधील आयोजित आमदार सरोज यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.
सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून असे संकट यापूर्वी कधीच आले नव्हते, आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट आली तर ३० वयोगटाच्या आतील लोकांना अधिक धोका असेल. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ३० ते ६० वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. आगामी दोन महिन्यात ७० टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारचं टार्गेट आहे. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून कोरोना कामात निधीची कमतरता भासू नये असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे चांगला पाऊस आल्यावरच पेरण्या करा. नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढवेल, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. राज्यात खतांची कमतरता नाही. कोरोना काळात जीडीपी राखण्याचं काम शेतकऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही पाच वर्षासाठी मुख्यमंत्री बसवलाय, त्यामुळे विचारच करायचा नाही
प्रमोशन व्हावं, मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले, मला प्रमोशन व्हावं असं नाही वाटत. तुम्हीही पत्रकार आहात. तुम्हालाही आपण संपादक व्हावं वाटतं. पण सर्वचजण संपादक होत नाही. एकच व्यक्ती संपादक होत असतो. आमच्याकडेही १४५मध्ये एकच माणूस मुख्यमंत्री होतो. तो आम्ही बसवलेला आहे. तोही पाच वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे पाच वर्षे याचा विचारच करायचा नाही असे सांगताच एकच हशा पिकला.