नागपूर : प्रतिनिधी
राज्यात सत्तास्थानी येवून या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. मात्र सरकारच्या कारभारामुळे देशातील शेतकरी हवालदील झाल्याची सरकारवर टीका करत असतानाच मध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे पहात जरा मन मोठी करून कामे करा परिवर्तन होईलच असा सल्ला राष्ट्रवादीतील नेत्यांना देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भर सभेतच दिल्याने हा सभेच्या ठिकाणी एकच चुळबूळ सुरू झाली.
राज्यातील शेतकऱ्यांच्यासह विविध महत्वाच्या प्रश्नी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आघाडीतील घटक पक्षांच्यावतीने विधानभवनावर जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांच्यासह दोन्ही पक्षातील मान्यवर नेते उपस्थित होते. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर प्रत्येक नेत्यांना दोन शब्द बोलण्याची संधी दिली जात होती.
त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांना बोलण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी सभेला उद्देशून बोलत असताना मध्येच राष्ट्रवादीतील नेत्यांना दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याच उपस्थितीत मन मोठे करून कामे करा परिवर्तन होईलच असा सल्ला दिला. तसेच ही सूचना नव्हे तर सल्ला आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे हा सल्ला राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याला दिला अशी चर्चा सभेच्यास्थानी सुरु झाली.
प्रफुल्ल पटेल यांच्या या सल्ल्यानंतर व्यासपीठावरील पहिल्या रांगेत बसलेले राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीवेळातच सभेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी पुन्हा फिरकलेही नाहीत. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचा सल्ला अजित पवार यांना तर नव्हता ना? अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली.