मुंबईः विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टोकाची भाषणे होवून सुध्दा एकमेकांच्या टोप्या उडविण्याबाबत जरा उत्साह कमीच जाणवत आहे. मात्र आज खोपरखळ्या आणि चिमटे काढण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे टोपी उडविण्याची संधी साधली.
विधानसभेत आज विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चा सुरु झाली. दुपारच्या सुमारात शिवसेनेचे सुनिल प्रभू हे बोलत असताना मध्येच भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावरून सत्ताधारी बाकावर खसखस पिकल्याने पुन्हा मुनगंटीवारांनी आता निवडणूका घ्या मग कळेल असे मिश्किल आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या सुधीर भाऊंना झालंय काय? असा तितकाच सवाल विचारला.
गेले काही दिवस बघतोय, सुधीर भाऊ कधी म्हणतात की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, कधी म्हणतात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही आणि आता थेट निवडणूका घ्या म्हणतायत असे अजित पवार म्हणाले.
त्यावर पवार पुन्हा म्हणाले की, सुधीर भाऊ आता विसरा आता ते. काहीही होणार नाही.
अजित पवारांची यांच्या मिश्किलीमुळे सभागृहात चांगलीच खसखस पिकली काही काळ सकाळपासून कंटाळवाण झालेलं वातावरण हलकंफुलकं झालं.
दोन दिवासांपूर्वी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल परब यांच्याबरोबरील मैत्री ३० वर्षापासूनची असल्याचा निर्वाळा देत अजित पवार यांच्याबरोबरील मैत्री त्या ७२ तासांपासूनची असल्याचे जाहिर केले होते. तसेच आणची खरी आणि चांगली मैत्री असून मित्र चुकत असेल तर त्यास सूचना करून पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न आपला असल्याचे सांगितले होते.
त्या त्यांच्या वक्तव्यानुसार ७२ तासांपासूनची जमलेल्या मैत्रीची आठवण कदाचीत अजित पवार यांनी ठेवून आमच्या सुधीर भाऊंना झालय तरी काय असा सवाल त्यातूनच तर विचारला नाही की काय अशी चर्चा विधानसभेत सुरु झाली.