Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करणार सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. समारंभास शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भय्याजी जोशी, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील- यड्रावकर, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

अपारंपरिक स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ग्रीन हायड्रोजन, सोलार एनर्जी असे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पातून दहा ते बारा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पर्यावरणाच्या विनाशाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला हवी, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचेल. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला माता आणि निसर्गाला ईश्वर मानले जात असून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.
कणेरी मठ येथे काडसिद्धेश्वर स्वामीजींनी शेतीत प्रयोग केले. पर्यावरणपूरक शेती बनवली. कणेरी मठ मोठे ज्ञानाचे भंडार असून हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव राज्याच्या अन्य शहरात आयोजित करून पंचमहाभूतांचे संवर्धन करण्याबाबत व्यापक काम होणे गरजेचे आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी वेगवेगळ्या कल्पना राबविल्या आहेत. त्यांच्या या कल्पना भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरतील.

काडसिद्धेश्वर स्वामीजींनी विषमुक्त शेती करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले असल्याचे सांगून या महोत्सवात उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण स्वागत करतो, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.

जोशी म्हणाले, या लोकोत्सवातून देण्यात येत असलेला पर्यावरण रक्षण आणि शांतीचा संदेश विश्वभर पोहोचेल.

पर्यावरण संवर्धनाविषयी ‘जाणू या पंचमहाभूतांचे महत्त्व जपू या त्यांचे अस्तित्व’ हा संदेश जगभर देऊया, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले. ते म्हणाले, आज पंचमहाभूतांचा समतोल ढासळला असल्याने यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यासाठी ‘पर्यावरण रक्षणाची स्वतः पासून सुरुवात करुया, निसर्गाची हानी थांबवू या व पर्यावरण रक्षण हाच परमार्थ समजू या’, असे आवाहन त्यांनी केले.

कणेरी मठ येथे वेस्ट पासून बेस्ट बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप सुरु करण्याचा मानस असल्याचे स्वामीजी यांनी यावेळी सांगितले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शासनाच्या प्रत्येक विभागाने आपले योगदान दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले
या समारंभात ‘सुमंगल विचार संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कापडी पिशव्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समारंभास पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *