मागील आठवडाभरात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपल्याने हाता तोंडाशी आलेली पिके हातची निघुन गेली. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकल्याचे चित्र दिसू लागले. याप्रश्नी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठविला. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली नाही. मात्र विधान परिषदेत याविषयीचा प्रश्न उपस्थित होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसात पंचनामे पूर्ण कऱण्यात येतील असे आश्वासन देत त्यानंतर मदत जाहिर करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचे दिसून आले. धुळे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त आनंदखेडे आणि भागाचा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, अवकाळी पावसामुळे आतापर्यत एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा असून दोन दिवसात वस्तूनिष्ठ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नुकसानीची माहिती मिळेल. नुकसानग्रस्त शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले.
तसेच यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, या भागात कांदा, गहू, बाजरी, पपई, टरबूज यांचे मोठे नुकसान झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सहा महिन्यात या सरकारने १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. गरज पडल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) निकषापेक्षाही जास्तीची मदत देण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबत दोन दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात घोषणा करतील, असे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य राम रघुवंशी, देवमन पवार यांच्यासह पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी विचारणा केली असता सत्तार यांनी संजय राऊत कधी खरे बोलतात का, जे आमच्या मतावर निवडून गेले ते आमच्यावर बोलणार, असे प्रश्न उपस्थित करुन राऊत यांच्यात हिंमत्त असेल तर दादा भुसेंचे आव्हान स्विकारुन खासदारकीचा राजीनामा देत परत निवडूण येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
आंदोलनात असूनही कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाच्या आंदोलन काळातही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असल्याची सकारात्मक बाब खुद्द शेतकऱ्यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगून शेतकऱ्यांप्रती सर्वांच्या भावना संवेदनशील असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे कौतुकही यावेळी कृषिमंत्र्यांनी केले.
अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार
धुळ्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनीही यापूर्वीच नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचेशी चर्चा करून महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करणेबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा करणार आहेत, असेही कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.
थेट बांधावर जावून पाहणी
आनंदखेडे, काळटेक, सिरबेन, बेटावर आदि ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवसभर कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी केली.
अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या #धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे कृषीमंत्री @AbdulSattar_99 यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका व कांदा पिकाची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. समवेत आमदार मंजुळाताई गावीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @girishdmahajan pic.twitter.com/9qZCWVTKix
— DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) March 22, 2023