Breaking News

फडणवीसांच्या गतीमान सरकारच्या काळातील रखडलेल्या कृषि पुरस्कारांचा वितरण सोहळा १९८ शेतकऱ्यांचा होणार सन्मान! २ मे रोजी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान कारभाराच्या काळात राज्यातील कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा कार्यक्रम रखडला होता. तो आता २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषि विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते, तो कार्यक्रम आता २ मे रोजी होणार आहे. कृषि, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्‍पादन- उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २ मे रोजी सकाळी ११ वा. तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह, सन्‍मानपत्र देवून सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
पुरस्कारांच्या संख्येत सन २०२० पासून वाढ
सन २०२० पासून विविध कृषि पुरस्‍कार मार्गदर्शक सूचनांमध्‍ये बदल करण्‍यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या १० वरुन ८ करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारांची संख्‍या २५ वरुन ४० करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या ५ वरुन ८ तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार ३ वरुन ८, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्‍कार ९ वरुन ८ करण्‍यात आली आहे. सन २०२० पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्‍कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्‍पर्धा रब्‍बीच्या तालुका, जिल्‍हा ,विभाग व राज्‍य पातळ्यांवरील बक्षीसांच्‍या रक्‍कमेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

१९८ पुरस्कारार्थ्यांचा ‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान
• डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार – ४ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ७५ हजार रुपये)
• वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार -२८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)
• जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार – ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ५० हजार रुपये)
• कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – २३ पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी ५० हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार – ९ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ३० हजार रुपये)
• उद्यानपंडीत पुरस्‍कार – २५ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी २५ हजार रुपये)
• वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार – सर्वसाधारण गट – ५७ पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट – १८ पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी ११ हजार रुपये)
• राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात – ९ पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन ९ पुरस्‍कारार्थी – प्रत्‍येकी प्रथम क्रमांक – १० हजार रुपये, व्दितीय क्रमांक- ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक ५ हजार रुपये
• पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्‍न पुरस्‍कार – ७ पुरस्‍कारार्थी.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *