स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील विविध ४४६ रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
२७ मे म्हणजे उद्यापासून सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम ताऱीख ११.०६.२०२३ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. तसेच याची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार आहे.
लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची बहुप्रतिक्षित पदभरती जाहीर केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची ०३ पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.