साधारणत: एक वर्षानंतर उत्तर प्रदेश, गुजरातसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सलग २० वर्षाहून अधिक काळ गुजरातमधील आपली सत्ता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा घेत नवा चेहरा देण्याचे संकेत दिले आहेत. रात्री गुजरात दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शाह हे आल्यानंतर रूपानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आज सोपविला. त्यामुळे आगामी राजकिय रणननीतीचा भाग म्हणून रूपानी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेन. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया विजय रूपाणी यांनी व्यक्त केली.
विजय रूपाणी आणि पक्ष संघटनेमध्ये अर्थात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत त्यांचे मतभेद होते. गेल्या वर्षीच भाजपाने रूपाणींविरोधात पक्षाला अहवाल दिला होता. तसेच रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पकड सैल होत असल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे होते. २६ डिसेंबर २०१७ रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. आम्ही त्याला पद नाही जबाबदारी नाही म्हणतो. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका लढतो आणि २०२२च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील निवडणूकाही पुढील वर्षी होत आहेत. त्यामुळे येथील सरकारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि कोरोनामुळे बदनाम झालेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गच्छंती करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह द्सतुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयत्न केले. मात्र ऐनवेळी राष्ट्रीय स्वंयस्वेक संघाने हस्तक्षेप केला. त्यामुळे तेथे नेतृत्व बदल करता आला नाही. यापार्श्वभूमीवर किमान आपले होम ग्राऊंड गुजरात हातचे जावू नये यासाठी रूपाणी यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे सांगत आहेत. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने चांगली लढत देत भाजपाची चांगलीच दमछाक केली होती.