मुंबई: प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज वरळी येथील नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. जवळपास चार तास ही बैठक सुरु होती. या बैठकीसाठी परिवहन आणि अर्थविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीतच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अंतिम तोडगा निघणार की काय अशी शक्यता निर्माण झाली.
बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल, त्यासाठी करायच्या उपाय योजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर सविस्तर चर्चा केली.
आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती मागणी आम्ही त्यांना दिली. यावर त्यांनी देखील सर्व माहितीचा अभ्यास केला आणि याबाबत वेगवेगळे पर्याय कशा पद्धतीने तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने यातून मार्ग काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा आज आमच्यसोबत झाल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर इतर राज्यात असलेली परिवहनचे काम कसे चालते, तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि त्यांना देण्यात येत असलेल्या सवलती यावरही चर्चा करण्यात आली. याशिवाय काही राज्यांमध्ये परिवहनचे विलीनीकरण झालेले आहे. ते कोणत्या आधारे झालेले आहे यावरही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु राज्यातील विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे या समितीसमोर सरकारने देखील आपली काय बाजू मांडावी? याबाबत देखील चर्चा झाली. परंतु विलनीकरणाचा जो मुद्दा आहे यावरच जो अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारू. फक्त हा अहवाल उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातूनच येईल. त्यामुळे विलनीकरणाचा जो विषय आहे हा या समितीच्या माध्यामातून येईल. परंतु सकारात्मक काय आपली बाजू मांडली पाहिजे, कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांचा आज सविस्तर विचार आणि चर्चा आज आम्ही केली आणि वेगवेगळे त्याला पर्याय तयार केले आहेत की कशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो या अनुषंगाने चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.