Breaking News

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! लसीकरणासाठी वयाची अट शिथील करण्यासाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी त्यांनी केली.

देशात महामारी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचे सरकार असताना महामारींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलीओ लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमणात राबविली, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवल्याने त्यावर मात करण्यात यश आले. पोलीओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. गरज आहे ती केंद्र सरकारने दृढ निश्चय करुन सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणात तसेच सरसकट कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्याची. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

EVM आणि VVPAT प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १८ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ एप्रिल) व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *