Breaking News

मुख्यमंत्री महोदय, अकरावी प्रवेशांमधील घोळ आता आवरा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

यावर्षी कोविड मुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्याप १ लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून हा घोळ मिटवा, विद्यार्थी, पालकांना होणारा त्रास थांबवा अशी विनंती करीत भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दहावीचे निकाल जुनमध्ये जाहीर झाले. त्यानंतर आजपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. यावर्षी निकाल लागल्यानंतर १५ दिवस विलंबाने ही प्रक्रिया  सुरू केली गेली. दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच ही प्रक्रिया सुरू केली असती तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुध्दा आरक्षणानुसार प्रवेश मिळून आरक्षणावर स्थगिती येईपर्यंत आपली प्रक्रिया पुर्ण झाली असती.  या शासन दिरंगाईचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसला.

यावर्षी मुळातच उशिराने सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया पुढील काळातही वेग पकडू शकली नाही. आजपर्यंत  ही प्रक्रिया वेगाने दोषमुक्त सुरू आहे असे चित्र सध्या राज्यात दिसत नाही. आज अखेर सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे  विद्यार्थी पालक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत वेळीच शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून मी खालील महत्वाच्या तातडीच्या मुद्यांकडे आपले लक्ष वेधतो आहे.

१       प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी  प्राचार्य आणि शिक्षकांची कमिटी गठीत करण्यात येते यावेळी ही कमिटी कोणताही अधिकृत शासन आदेश न काढता बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी संपुर्ण प्रक्रिया केवळ शासनाच्या अधिकारी पातवळीवर हाताळली जात आहे. त्यामुळे यावर अन्य कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही त्यातून भ्रष्टाचार व चूका होण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने शिक्षक आणि प्राचार्य यांची कमिटी गठीत करण्यात यावी

२        प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका देण्यात येते यावेळी ही पुस्तिका अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अद्याप अनेक मुद्यांचा संभ्रम दिसून येतो आहे.  तातडीने शासनाने याबाबत उपाययोजना करून विद्यार्थ्यांना मागदर्शन करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.

३       यावेळी आरक्षणाचा फायदा होणाऱ्या विद्यार्थ्यांसह अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रथमच जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र प्रवेश घेताच विद्यार्थ्यांना अपलोड करण्यास सांगितले. वास्तविक विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर असलेला जातीचा उल्लेख ग्राहृय धरून हमी पत्र दरवर्षी घेतले जाते. त्यानंतर विद्यार्थी आपले जात प्रमाणपत्र सादर करतो, यावेळी यामुळे सुध्दा काही अडचणी निर्माण झाल्या याबाबत पालकांनी विरोध केल्यानंतर ही अट रद्द करण्यात आली. मात्र त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत घोळ वाढला.

४        दरवर्षी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत विविध आरक्षणाच्या शिल्लक जागांचे कनर्व्हजन खुल्या प्रवर्गात केले जाते. यावर्षी अद्याप या जागांचे कनर्व्हजन केले गेले नाही. त्यामुळे त्या कोटयातील जागांचे गणित जूळून आलेले नाही, त्यामध्ये विद्यार्थ्यांचेच नुकसान होते आहे.

५       शासनाने प्रवेश प्रक्रियेतील पार्ट २ मधील माहिती अद्ययावत करण्याचे सक्तीचे आदेश विद्यार्थ्यांना दिले होते. पण या सूचना सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ही माहिती नव्याने भरली नसेल तर पुर्वी भरलेली माहिती ग्राह्य धरण्यात यावी.

६       विशेष फेरी १ नंतर यावर्षी ऑफलाईन प्रवेश सुरू करण्यात येईल असे विद्यार्थ्यांना सांगण्यात येते आहे. त्यामुळे या ऑनलाई प्रवेश प्रक्रियेच्या मुळ हेतूलाच बाधा येत असून तातडीने ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याऐवजी विशेष फेरींची संख्या वाढविण्याची गरज आहे.

७       १० वीच्या ऑक्टोंबर मध्ये घेण्यात आलेल्या फेर परिक्षेचे निकाल आता लागणे अपेक्षित आहे, ते निकाल ही प्रवेश प्रक्रिया पुर्ण होण्याआधी लावून त्याही विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सामावून घेतल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

८        दरवर्षी प्रवेश प्रक्रियेतील फीचा काही हिस्सा मार्गदर्शक केंद्र व शाळांना प्रोसेसिंग फी म्हणून खर्चासाठी देण्यात येतो. यावर्षी ही रक्कम विद्यार्थ्यांकडून शासनाने घेतली असली तरी शाळांना वर्ग करण्यात आलेली नाही.

९       सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोविडमुळे तसेच लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती अद्याप सुस्पष्टपणे पोहचलेली नाही. तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुर्ण माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

विशेष फेरीला केवळ तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, ही मुदत २४ डिसेंबर रोजी संपत असून दरम्यानच्या काळात बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेता या फेरीची मुदत वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

अद्याप १ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे  तसेच वारंवार विद्यार्थी पालक यांच्याकडून तक्रारी येत असल्यामुळे आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एखाद्या समिती मार्फत या संपुर्ण  प्रक्रियेचे पुर्नरावलोकन करून यातील दोष दूर करण्यात यावे अशी विनंती आहे.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *