शहर-ग्रामीण भागत असलेल्या जातीवाचक वस्त्यांची नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने वास्तवादी परिस्थिती आणि त्यावर उपरोधिक पध्दतीने दोन गावकऱ्यांमधला काल्पनिक संवाद…
ग्यानबा : म्हादबा…ऐकलंस कारं आपल्या मायबाप सरकारचा क्रांतिकारी फैसला..?
म्हादबा : कनचा रं बबा …
ग्यानबा : अरं, आतापास्तोवर आपल्या वस्तीला ‘म्हार वाडा’..त्या खालच्या आळीला ‘मांग वाडा’ अन वरच्या अंगाला असलेल्या सोनवण्याच्या वस्तीला ‘चांभार वाडा’ म्हणलं जायचं नव्हं..
म्हादबा : व्हय..मंग..
ग्यानबा : आरं, आता आपल्या जातीच्या नावावर असल्याली ही समदी नावं बदलणार हाय बग सरकार मायबाप..समजलं का..लय भारी क्रांतिकारी निवाडा हाय बग हा…
म्हादबा : नाय समजलं बग काय म्हणायचंय तुला ग्यानबा…इस्कटून सांग की जरा..
ग्यानबा : आरं..बाबा…आपल्या ‘म्हार वाड्याला’ आता ‘ डाक्टर आंबेडकर नगर’ म्हणायचं…त्या ‘मांग वाड्याला’ ‘लहुजी वस्ताद नगर’ अन सोनवण्याच्या ‘चांभार वाड्याला’ ‘संत रोईदास’ नगर म्हणायचं असा हुकूम काढतंय बग आपलं सरकार…
म्हादबा : अनं त्यानं काय व्हनार…
ग्यानबा : एव्हढा कसा रं खुळा तू म्हाद्या…आरं म्हार वाडा…मांग वाडा… चांभार वाडा…ही नावं जातीवाचक ह्यांत ना बाबा म्हणून ती बदलत्यात…
म्हादबा : व्हय..आलं आताशी ध्यानात…वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून त्या-त्या जातीतील महापुरुषाची नावं त्या वस्त्यांना टाकायची..म्हंजी जाती तोडणाऱया महापुरुषांना त्यांच्याच जातीत बंद करायचं..खरंच ग्यानबा लय भारी शक्कल लावली मायबाप सरकारनी…
ग्यानबा : काय म्हणायचंय काय तुला लेका…
म्हादबा : आरं सरकारला नावं बदलायचीत ना मंग ‘बामण आळी’ ला ‘आंबेडकर नगर’, मराठ्यांच्या वस्तीला ‘लहुजी वस्ताद नगर’, चांभार वाड्याला ‘संभाजीनगर’ …अशी नावं देत्यात का बग…कश्या दंगली घडत्याल अन कसं मुडदे पडत्याल बग मंग ग्यानबा…शिरतंय का डोकस्यात काही…
ग्यानबा : व्हय बाबा…येतंय बग ध्यानात…
म्हादबा : अनं, ग्यानबा खरंच तुझ्या सरकार मायबापाला जातीवाचक वस्त्या बाद करायच्या असतील ना मंग असं नावं बदलण्याबिगर गांवकूसाबाहेर ‘व्हड्या अनं गटार-नाल्याच्या’ उतरंडीला असणारे हे ‘म्हार-मांग-चांभार’ वाडे थेट गांवकुसाच्या आत का नेत नाहीत रे…तसंबी मराठ्यांना आपल्यावानी आरक्षण हवंय म्हणत्यांत ना मंग त्यांच्यावानीच आम्हासनी बी घरं द्या की म्हणावं गावकुसात त्यांच्या घरांना खेटून…
ग्यानबा : तुज ऐकून डोकं गरगरायला लागलं बग लेका…
म्हादबा : सावर सवताला…पडला बिडलास तर घातलेली पांढरी कापडं माखतीन…रात्री बरोबर ‘बाराच्या ठोक्याला’ जायचंय नव्हं पांढरी-सफेद फडफडीत कापडं घालून मेणबत्ती लावायला ईहारात… _’महापरिनिर्वाण दिन’_ हाय नव्हं…
मिलिंद भवार
_पँथर्स_
9833830029