मुंबई: प्रतिनिधी
भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेची सुरुवात करण्या आधी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा विद्यमान भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत दर्शन घेतले. मात्र राणे तेथून निघून गेल्यानंतर त्यांच्या भेटीमुळे स्मृतीस्थळ अपवित्र झाल्याच्या भावनेतून दोन शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ शुध्दीकरण करण्यास सुरुवात केल्याची घटना उघडकीस आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होते. राणे निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दुधानं शुद्धीकरण करत त्यांनी केलेली वाहीलेली फुलेही स्मृतीस्थळावरून काढून फेकून देण्यात आली. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण केले. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत.
दरम्यान, नारायण राणे या ठिकाणी सकाळी आले होते, त्यासाठी हे शुद्धीकरण केल्याचं सांगितलं जात आहे. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.
दरम्यान, आप्पा पाटील यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत म्हणाले की आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले.